वृक्ष रक्षाबंधन: महिलांनी पिंपळवृक्षाला राखी बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश!
गांधीनगर उद्यानातील पिंपळ वृक्षाला राखी बांधताना योग साधना ग्रुपच्या महिला

पुसद :भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जाणारा राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. नेमका हाच संदेश वापरून येथील योग साधना ग्रुपच्या महिलांनी गांधी नगर बगीच्यातील पिंपळ वृक्षाला पर्यावरणपूरक राखी बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना करीत अनोखे रक्षाबंधन साजरे केले. निसर्गाला जपण्याचा संदेश या रक्षाबंधनातून देण्यात आला. श्रावण म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. देवधर्म भक्ती वाढविणारा. त्याच वेळी निसर्गाची वेगळी अनुभूती देणारा. या महिन्यात येणारा रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आनंदक्षण. बहिण भावाला राखी बांधते आणि एक प्रकारे तिच्या रक्षणाची विनवणी करते. हाच भाव निसर्गशी जपताना येतो. निसर्ग आपली जपणूक करतो. वृक्षवल्ली आपणासाठी सोयरी ठरते. मात्र त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. हाच भाव लक्षात घेऊन योगसाधना ग्रुपच्या महिलांनी आगळीवेगळी रक्षाबंधनाची संकल्पना राबवली. महिलांनी गांधी नगरातील बगीच्यातील पिंपळ वृक्षाला पर्यावरणपूरक राखी बांधली. ही राखी, कागद, कापूस आणि बियाणे यापासून तयार करण्यात आली. हे तिनही घटक पर्यावरणपूरक आहेत. निसर्गाचे पर्यावरण संतुलन राखले तर नवीन पिढीला आरोग्यदायी आयुष्य मिळू शकेल, अशी भावना महिलांनी प्रकट केली.या रक्षाबंधनानिमित्त गांधीनगर बगीच्यात महिलांनी सुगंधी फुलांची तसेच ऑक्सिजन पुरवणारी तुळशी रोपटे लावली.श्रावणातील या भावबंधन सोहळ्यात साधना ठाकरे , वैशाली ठाकरे, डॉ. माधवी गुल्हाने, पद्मजा चेपुरवार, मेघा कान्हेकर, राखी देशमुख,प्रिती व्यवहारे, सोनाली शिरभाते, मालू चव्हाण,अश्विनी चहाण, कल्पना सोळंके सहभागी झाल्या.



