जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड पुसद शाखेच्या स्थानिक सल्लागार समितीवर खातेदार व ठेवीदाराकडून कारवाई करण्याची मागणी!

पुसद : शहरातील जनसंघर्ष अर्बन निधी ली. शाखेच्या खातेदारांनी स्थानिक सल्लागार समितीच्या सल्ल्याने जवळपास अंदाजे ६२० खातेदार व ठेवीदाराने सुमारे १३ कोटी६४ लाख ४२हजार५३५ रुपयांच्या ठेवी या जन संघर्ष अर्बन निधी शाखेत ठेवल्या होत्या मात्र, या शाखेचे अध्यक्ष व१४ संचालक मंडळ तसेच १२स्थानिक सल्लागार समितीच्या अनागोंदी कारभारामुळे ही शाखा बुडीत जाण्याची शक्यता निर्माण झाली असून ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मागितल्या आहेत. मात्र, त्या अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे खातेदार-ठेवीदारांत असंतोष निर्माण झाला आहे. शेकडो लोकांच्या ठेवी घेऊन या शाखेचे अध्यक्ष फरार झाल्याने शाखा व्यवस्थापकांनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथे तक्रार दाखल केली असून शेकडो खातेदाराची व ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात खातेदाराच्या व ठेवीदाराच्या मनात भीती निर्माण झाली असल्यामुळे जन संघर्ष अर्बन निधी शाखेचे अध्यक्ष व संचालक मंडळासह स्थानिक सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्याची शासनाने तात्काळ संपूर्ण इस्टेट ताब्यात घेऊन ठेवीदाराची व खातेदाराची रक्कम अदा करावी तसेच संबंधितावर फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी खातेदार व ठेवीदारांकडुन करण्यात येत आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेडची मुख्य शाखा दिग्रस येथे आहे. त्याच्या इतर तालुक्यात आक शाखा आहेत. त्यापैकी पुसद शाखेचा दि.२१ जानेवारी २०२१ रोजी शुभारंभ झाला होता.त्याचे अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे आहे.ठेवी गोळा करण्यासाठी स्थानिक सल्लागार समिती नेमून त्यांच्या सल्ल्याने ठेवीदारांना व खातेदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून जवळपास ६२० खातेदार व ठेवीदाराकडून मोठ्या रकमेच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. परंतु या व्यवसायातील आर्थिक सुरक्षिततेचे निकष सर्वसामान्यांना माहीती नसल्याने ज्यादा व्याजाच्या लालसेपोटी या बँकेत आपल्या ठेवी ठेवल्या त्याला बरेच खातेदार व ठेविदार बळी देखील पडले. जनसंघर्ष अर्बन निधी लि शाखा पुसद अडचणीत आल्याचे काही ठेवीदारांना लक्षात येताच ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मागितल्या आहेत. मात्र, त्यांना उडवा उडवीचे उत्तरे या शाखेच्या व्यवस्थापकाकडून मिळू लागल्याने खातेदार व ठेवीदारांत असंतोष निर्माण झाला असून त्यानंतर दि.९ डिसेंबर २०२४ रोजी जमा केलेल्या ठेवी परत घेण्यासाठी गेलेल्या ठेवीदार व बँकेचे व्यवस्थापकाने दि.९ डिसेंबर रोजीच्या संध्याकाळी शहर पोलीस ठाणे गाठले असता शहर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारासमोर शाखा व्यवस्थापकाने ठेवीची रक्कम देण्यास असमर्थ्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शाखा व्यवस्थापक वाळले यांनी संस्थेच्या अध्यक्ष विरोधात तक्रार दिली आहे. संस्थेच्या अध्यक्ष मार्फतच ठेवीची रक्कम मिळत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अशावेळी ठाणेदाराने ठेवीदाराची समजूत काढली आहे. यात विशेष बाब म्हणजे जन संघर्ष अर्बनच्या अध्यक्षांने आठही शाखेत मधील मोठी रक्कम घेऊन व अधिकारी कर्मचाऱ्यांसह ठेवीदारांना वाऱ्यावर सोडून फरार झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जन संघर्ष अर्बन निधी शाखेचे अध्यक्ष१४ संचालक मंडळ तसेच १२स्थानिक सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्याची शासनाने तात्काळ संपूर्ण इस्टेट ताब्यात घेऊन ठेवीदाराची व खातेदाराची रक्कम अदा करावी तसेच संबंधितावर फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी खातेदार व ठेवीदारांकडुन करण्यात येत आहे.या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केला जात आहे.



