माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

पुसद: येथील माऊंट लिटरा झी स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करून विधिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्रभुत्व संपादन केले. दलित, शोषित आणि पीडित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. ते पत्रकार, कृषी तज्ञ, शिक्षणतज्ञ प्रज्ञासूर्य, विश्वभूषण होते. त्यांनी ‘लोकशिक्षक’ या नात्याने अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडले.जो समाज अशिक्षित असतो तो शिक्षणाअभावी सर्वस्व गमावलेला असतो, शिक्षणाने माणसात कर्तव्य आणि हक्काची जाणीव निर्माण होते, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे आणि आपल्या शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत आणि कळकळीने समजावून सांगताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते की “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.”स्वातंत्र्य,समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला राज्यघटनेचे अभेद्य कवच देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रहीत, सामाजिक व शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना कळावे त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे हा दूरदृष्टीकोन ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गट्टाणी,उपाध्यक्ष अमर आसेगावकर ,सचिव संदीप जिल्हेवार ,कोषाध्यक्ष रवी गट्टाणी,संचालक भागवत चिदरवार व सर्व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनाने हा आदरांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .सदर कार्यक्रमात आकाश खंदारे या शिक्षकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र व कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंग चाैव्हाण, शाळा समन्वयक सुशील दीक्षित, सर्व क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अविनाश देशपांडे यांनी केले.



