वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार सोहळा म्हणजे बळीराजाच्या कर्तृत्वाचा गौरव-ॲड.राहुल नार्वेकर अध्यक्ष विधानसभा!

पुसद:माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त दि. १८ ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने येथील सुधाकरराव नाईक प्रेक्षागृह बा. ना. अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद येथे आयोजित कृषी गौरव पुरस्कार सोहळा थाटात पार पडला.
यावेळी या कार्यमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. शरद गडाख कुलगुरु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे होते. प्रारंभी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन मान्यवरांनी अभिवादन करण्यात आले.सर्वप्रथम व. ना. महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायले त्यानंतरप्रा. चंद्रकिरण घाटे यांनी वसंत गीत गायीले. स्वागतगीत झाल्यानंतर प्रतिष्ठानतर्फे ना. राहुल नार्वेकर यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक व माजी आ. ॲड. निलय नाईक यांनी स्वागत केले.
कुलगुरु डॉ. शरद गडाख यांचा धनंजय सोनी यांनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आला.त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष ना. ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी संस्थांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये संतोष पन्हाळे, सौ. अवंतिका विजय सुकळकर, यज्ञेश वसंतराव कातबने, माऊली गोविंद जाधव, सौ. संगिता वाल्मिक सांगळे, शशांक मुकेश पाटील, गोपाल सुर्यभान भक्ते, अशोक शिवरामजी वानखेडे, सुशांत मोहन नाईक, डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी यांचा समावेश आहे. याप्रसंगी प्रा. दिनकर गुंतल्याने संपादक असलेल्या चतुरस्त्र या स्मरणिकेचे विमोचन ना. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचेः ना. इंद्रनिल नाईक : प्रास्ताविकात राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी कृषी क्षेत्रात परिश्रम घेवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचे असल्याचे स्वागतध्यक्ष ना. इंद्रनिल नाईक म्हणाले. यासोबतच वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची व स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.
तसेच जलसंधारण सप्ताह व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिन २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महा वॉकेथॉन वॉक फार वॉटरचे आयोजन करण्यात आले प १/४ नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी केले. ते पुढे म्हणाले, दरवर्षी जेव्हा आपण कास्तकारांचा सन्मान करतो तेव्हा तो कास्तकार कशा रितीने आपल्या शेतीला कसतो आणि आपली शेती कशी उन्नत करतो हे शेतकऱ्यांना माहित असायला पाहिजे.
कृषी विकासात वसंतराव नाईकांचे योगदान मोठेः कुलगुरू डॉ. शरद गडाख या भावपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. आणि वसंतराव नाईक यांच्या विचारांची परंपरा प्रतिष्ठानने पुढे सुरू ठेवली आहे. २००३ मध्ये याच प्रतिष्ठानकडून मला उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कारातून मिळालेली प्रेरणा आजही स्फूर्तीदायक आहे, असे त्यांनी सांगितले.वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्रात कृषी विकासाला मोठी चालना मिळाली. चार कृषी विद्यापीठांची निर्मिती, महाबीज, रोजगार हमी योजना, ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती आणि राज्याला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज देश अन्नधान्याची निर्यात करीत असून कृषी क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. या परिवर्तनाच्या वाटचालीत वसंतराव नाईक यांचे योगदान विसरता येणार नाही, असे डॉ. गडाख म्हणाले. यावेळी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन उपक्रमांची आणि कृषी विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 
ना. ॲड. राहुल नार्वेकर अध्यक्षीय भाषणात ना. ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार सोहळा म्हणजे बळीराजाच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा सोहळा आहे. एकेकाळी देशाला अन्नसुरक्षेसाठी परदेशाकडे पाहावे लागत होते; मात्र आज भारत अन्नधान्याची निर्यात करणारा देश बनला आहे. या परिवर्तनात शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे देशाच्या पोशिंद्याप्रती कृतज्ञता व्य करण्यासाठी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही आपली जबाबदारी आहे. ही वसंतराव नाईकांची भूमी आहे. त्यांनी सत्तेतील माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर नेले. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात चार कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे शिक्षण आणि संशोधनाची दिशा मिळाली, असेही ना. राहुल नार्वेकर म्हणाले.
कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याची गरज : आज अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर सुरू आहे. कृषी क्षेत्रातही एआयचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना त्याचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात एआयचा उपयोग भविष्यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून शेती अधिक ज्ञानाधारित करण्याचे आवाहन ॲड. नार्वेकर यांनी केले.
विकसित भारत घडवायचा असेल तर कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्वपूर्ण योगदान असून शेतकऱ्यांना पुढे नेल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. कृषी विकासासाठी सातत्याने संशोधन आणि नवतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. शेतकरी समृद्ध व्हावा, हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन ना. राहुल नार्वेकर यांनी केले.नाईक परिवाराच्या लोकसेवेचा गौरव नाईक परिवाराने ७५ वर्षांहून अधिक काळ पुसदची सेवा केली आहे. लोकसेवेचा हा वारसा पुढे नेला जात असल्याचा आनंद असल्याचेही ॲड. नार्वेकर यांनी नमूद केले.वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार हा समाजोपयोगी, लोकोपयोगी आणि उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणारा उपक्रम असल्याचे ना. राहुल नार्वेकर म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण व माधवी गुल्हाणे यांनी केले. आभार प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके यांनी मानले.
या भावपूर्ण सोहळ्यास या भावपूर्ण कार्यक्रमास व्यासपीठावर आ. किसन वानखेडे, भाजपा माजी आमदार ॲड.निलय नाईक, नगराध्यक्षा मोहिनी नाईक, माजी नगराध्यक्षा अनिता नाईक, माजी आ. ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलिस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे, कार्याध्यक्ष धनंजय सोनी, वसंतराव घुईखेडकर, बाळासाहेब पाटील कामारकर, प्रविण देशमुख, निळकंठ पाटील, विजय जाधव, अनिरुध्द पाटील चोंढीकर, गोविंद फुके, दीपक आसेगांवकर, नितीन भुतडा, प्राचार्य उत्तम रुद्रावार, काकडदातीच्या सरपंच शोभा शेवाळे, श्रीरामपूरचे सरपंच आशिष काळबांडे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील अदि मान्यवर उपस्थित होते.



