राज्याला जलक्रांतीचा मूलमंत्र देणारे माजी मुख्यमंत्री कै.सुधाकरराव नाईक स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान पुष्प;श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद च्या वतीने आयोजन!

पुसद :महाराष्ट्रात पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत आशा उगवते आणि उन्हाळा सुरू झाला, की तीच आशा टँकरच्या रांगेत कोरडी पडते. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काही नेत्यांनी दीर्घकालीन उपाय सुचविले त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री भूतपूर्व राज्यपाल, जलसंधारणाचे प्रणेते ,पुष्पावंती परिसरातील भूमिपुत्र ,कै. सुधाकरराव नाईक यांचे नाव अग्रस्थानी आहे.कै. सुधाकरराव नाईक यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यान पुष्पाचे आयोजन शुक्रवार दि.२१ ऑगस्ट २०२६ रोजी श्री शिवाजी विद्यालयाचे देवराव पाटील चोंढीकर सभागृह पुसद येथे सायंकाळी ठीक६:३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. सलग चालणाऱ्या व्याख्यान पुष्पाचे हे २६ वे वर्ष असून सदर व्याख्यान पुष्प ख्यातकीर्त युवा निरूपणकार तथा व्यासंगी सुप्रसिद्ध वक्ते प्रा. श्री गणेश आत्माराम शिंदे, पुणे हे गुंफणार आहेत. व्याख्यानाचा विषय जीवन सुंदर आहे. या विषयावर प्रा.गणेश शिंदे आपल्याशी संवाद साधून आपणास अंतर्मुख करायला लावणाऱ्या या श्रवणीय व्याख्यानाचा लाभ पुष्पावंती परिसरातील सर्व रसिक वृंदांनी घ्यावा असे आवाहन विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद चे अध्यक्ष डॉ. गणेश पाटील , कार्याध्यक्ष दीपक आसेगावकर, श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर, सचिव सुधाकर ठाकरे, कोषाध्यक्ष प्रा. गोविंद फुके यांनी केले आहे.



