“धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, विभाजनासाठी नाही”; प्रा. जावेद पाशा कुरेशी यांचा प्रबोधनपर संदेश

पुसद : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त पुसद येथे आयोजित प्रबोधनपर व्याख्यानात नागपूर येथील प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी सामाजिक समता, धर्म, शिक्षण आणि राजकीय जागरूकतेवर प्रभावी व अभ्यासपूर्ण भाष्य केले. महात्मा फुले जयंती उत्सव समिती, पुसद यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. १० एप्रिल २०२६) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
प्रा. कुरेशी यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले की, “धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, विभाजनासाठी नाही” आणि “सांस्कृतिक संघर्ष हा मानवते च्या मानगुटीवर बसलेला राक्षस आहे”. त्यांनी स्पष्ट केले की, धर्माचा मूळ उद्देश मानवतेची जपणूक असला तरी आज धर्माच्या नावाने समाजात तणाव निर्माण केला जात आहे. “हजारांमध्ये फारच कमी लोकांना धर्म समजतो, बाकी समाजजीवन जगतात,” असे सांगत त्यांनी धर्माच्या नावाने होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या प्रवृत्तीवर टीका केली.
ते पुढे म्हणाले की, “शिक्षण हाच खरा धर्म आहे, अन्यथा धर्म टिकू शकत नाही” हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा मूलभूत विचार आजही तितकाच लागू आहे. फुले यांनी ‘सत्यशोधक’ विचार मांडत समाजात समता आणि बंधुतेचा मार्ग दिला. “सत्यशोधक विचार समाजात समता आणि बंधुता निर्माण करणारा मार्ग आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.प्रा. कुरेशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत सांगितले की, “सावित्रीबाईंच्या नैतिक पाठबळामुळेच ज्योतिबांची क्रांती यशस्वी झाली”. त्यांनी फातिमा शेख यांचाही उल्लेख करत स्त्रीशिक्षणाच्या चळवळीतील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून दिले. “स्त्रीशिक्षणामुळे समाजात मोठा बदल घडला, आजही त्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.राजकारणाच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडणी केली की, “राजकारण तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीची किंमत ठरवणारी मोठी संस्था आहे”. त्यामुळे नागरिकांनी राजकीयदृष्ट्या सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा उल्लेख करत सांगितले की, “शिवरायांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले होते”. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांच्या विचारांना पुढे नेत संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची दिशा दिली. “फुले ते आंबेडकर विचारसरणी हीच सामाजिक न्यायाची खरी दिशा आहे,” असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. उद्घाटन नगराध्यक्ष सौ. मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी आत्माराम जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सौ. विशाखा समीर गवळी उपस्थित होत्या.मंचावर प्रा. दिनकर गुल्हाने, बांधकाम सभापती अभिजीत पानपट्टे, पाणीपुरवठा सभापती राजेश साळुंखे, नगरसेवक ऋषिकेश पंडितकर, आरोग्य सभापती मजहर पठाण, संभाजी ब्रिगेडचे सुधीर देशमुख, माजी नगरसेवक साकिब शाह, सामाजिक कार्यकर्ते विष्णू गुद्दटवार तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष समीर गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती वाट यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव सर यांनी मानले. या व्याख्यानामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जागृती निर्माण झाली असून महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
महात्मा फुले जयंती उत्सव समिती
अध्यक्ष समीर शिवाजीराव गवळी, कार्याध्यक्ष नानाभाऊ घाटे, सचिव ओमकार सोनटक्के, सहसचिव वैभव गवळी, उपाध्यक्ष उमाकांत सोनटक्के, राजूभाऊ मोरे (अरेगाव), कोषाध्यक्ष सौरभ विश्वनाथ मोरे, रॅली व शोभायात्रा प्रमुख राज गिऱ्हे, आकाश गवळी, ओम गवळी, सुमित दळवे, समीर मोरे, संघटक देविदास झरकार (पार्डी), निमंत्रक लक्ष्मणराव आगासे, प्रसिद्धी प्रमुख मारोती भस्मे, प्रकाश लामने, मार्गदर्शक आत्माराम जाधव, बुद्धरत्न भालेराव, मुरलीधर जाधव, गणेश मोरे, डॉ. रोहित राऊत, प्रशांत गिऱ्हे, मनोज गवळी, डॉ. गणेश गवळी तसेच महिला प्रतिनिधी सौ. सीमा सुनील गिऱ्हे, सौ. विशाखा समीर गवळी, देवानंद जांबुतकर, सुशांत कदम, प्रशांत गिऱ्हे, श्रावण मोरे, आकाश गवळी, इंद्रजित जाधव, निरंजन घाटे, किशोर जाधव, शंकर गिऱ्हे, विवेकानंद गवळी, विवेक बैस्कर, दीपक घाटुळ यांच्यासह अनेक समाजबांधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजन नियोजन मध्ये अथक परिश्रम करून यशस्वीरित्या पार पाडला



