मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा-ॲड.आशिष देशमुख,जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर येथे साखळी उपोषण सुरु!

श्रीरामपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने विशेष अधिवेशन बोलवून आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा अन्यथा भविष्यात होणार्या परिणामांना शासन जबाबदार असेल असे मत महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा सदस्य अॅड.आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.
ते येथील संकट हरण मंदिराच्या प्रांगणात सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार(ता.३१)पासून आयोजित केलेल्या बेमुदत साखळी आंदोलन प्रसंगी बोलत होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांची मुदत दिल्यानंतरही शासनाने आरक्षण न दिल्याने अंतरवाली सराटी येथे गेल्या सहा दिवसांपासून ते पुन्हा उपोषणास बसले आहेत. परंतु शासन त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याने त्यांच्या समर्थनार्थ श्रीरामपूर येथे पुसद,काकडदाती व कवडीपूर या गावांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली.बेमुदत साखळी उपोषणास पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर,मराठा युवा मंचचे दीपक काळे,माजी प्राचार्य डाॅ.गणेश पाटील,निळकंठ पाटील,वामनराव देशमुख,अशोक बाबर,दीपक जाधव,साहेबराव ठेंगे,प्रभाकर टेटर,नाना जळगांवकर,डाॅ.आशा कदम,शंकर चौधरी,संजय ठाकरे,नितीन पवार आदी मान्यवरांसह शेकडो मराठा महिला व पुरुष उपस्थित होते.सुरवातीला मान्यवर व उपोषणकर्त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी दिलीप पाटील कान्हेकर, शिवाजीराव कदम, हरिभाऊ ठाकरे, यशवंतराव देशमुख,बंडू पारटकर,
सोनू पाटील,सचिन सुरोशे, संदीप कदम,प्रमोद कदम व पंजाब वानखेडे उपोषणास बसले असून दररोज दहाजण उपोषणास बसणार आहेत.
पुढे बोलतांना अॅड.देशमुख यांनी संबोधित करतांना हिंसक प्रकारचे आंदोलने करुन मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याचे षडयंत्र रचल्या जात असून सकल मराठा समाज अशाप्रकारचे आंदोलनाचे समर्थन करणार नाही व संवैधानिक पद्धतीच्या मार्गानेच मागणी मान्य करुन घेऊ असेही सांगितले. दिगंबर जगताप यांनी ही उपस्थितांना संबोधित केले.
साखळी उपोषणाला माजी नगराध्यक्ष अनिता नाईक,सामाजिक कार्यकर्त्या अॅड.मोहिनी नाईक यांनी भेट देऊन मराठा समाजाने नाईक परिवाराला नेहमी साथ दिल्याचे सांगून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे सांगितले.यावेळी एका कार्यकर्त्याने आमदार इंद्रनिल नाईक यांना या प्रश्नी राजीनामा द्यायला लावा असे म्हणताच तुमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे सांगितले.वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकार्यांनीही उपोषण मंडपास भेट देऊन मराठा आरक्षणाला पाठींबा असल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिले.ता.१ नोव्हें.पासून भोजला व निंबी येथेही साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे.
कॅंडल मार्चचे आयोजन
बुधवारी (ता.१)सायं ६:३०वा.सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीरामपूरातील उपोषण स्थळ ते छत्रपती संभाजी महाराज चौक श्रीरामपूर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद दरम्यान कँडल मार्च आयोजन करण्यात आले आहे.



