मराठा सेवा संघाने समाजाला डोळस केलं;संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख : वर्धापनदिन उत्साहात साजरा!

पुसद: मराठा सेवा संघाने मराठा समाजासह अठरा पगड जातींना डोळस करण्याचे काम मराठा सेवा संघाने केल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख यांनी केले.ते येथील शिवाजी मंडप डेकोरेशनच्या सभागृहात मराठा सेवा संघ शाखा पुसद व्दारा शुक्रवारी(ता.१) आयोजित केलेल्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यशवंत देशमुख, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील टेटर, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष मंदाताई इंगोले, शुभांगी ताई पानपट्टे, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष नितीन पवार, बंडू पारटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमांचे पूजन करून मारल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. प्रमुख अतिथी यशवंत देशमुख यांनी प्रास्ताविकातून मराठा सेवा संघाच्या वाटचालीतून सामाजिक संघटन मजबूत करण्याबरोबरच मेंदूची गुलामगिरी घालविण्याचे काम केले आहे. संविधानाच्या मूल्यांचा बचाव करून शुद्ध आचरण करणे तसेच प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश टाकण्याचा काम मराठा सेवा संघाने केल्ल्याचे सांगितले.आदित्य जाधव यांनी इतर संघटना व सेवा संघ यांच्यातील फरक स्पष्ट करुन कमकुवत झालेली बुद्धी,विचारसरणी यांना सशक्त करुन निर्भिडपणे जगण्याचे बळ सेवा संघातून मिळते असे मत व्यक्त केले.पुढे बोलताना सुधीर देशमुख यांनी इतर संघटनांनी मराठा सेवा संघाचा अपप्रचाराचा समाजात पोहोचवण्याचे काम केल्याचे सांगून सेवा संघाने समाजाला डोळस करण्याबरोबरच चिकित्सक करण्याचे काम केले आहे.वाचन, चिंतन, मनन करण्याचं तसेच धैर्याने आलेल्या संकटावर सामना करण्याचे बळ सेवा संघाने दिल्याचे सांगितले. सेवा संघ ही संघटना व्यक्तिकेंद्रित नसून संघटन केंद्रित आहे. संघामुळे शिव,शाहू,फुले, आंबेडकर हे समाजाला कळलेले आहेत. संघाच्या विचारावर चालल्यास निश्चितच प्रत्येकाची प्रगती होईल यामध्ये दुमत नसल्याचे सांगून पंचसूत्रीच्या अवलंबनाने आकाशाला गवस निघाल्याची क्षमता सेवा संघात असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत जामगडे यांनी केले. आभार प्रदर्शन माजी तालुकाध्यक्ष प्रकाश बेद्रे यांनी केले. यावेळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष करण पानपट्टे,प्रवीण कदम,सचिन सुरोशे,शिवाजी कदम,हरिभाऊ ठाकरे,हरगोविंद कदम,प्रतापराव पतंगे,परमानंद जोगदंड,सचिन सुरोशे,शिवाजी पवार यांचेसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.



