शाश्वत विकास घडवून आणण्याची ताकद युवकांमध्ये आहे–प्रा. गजानन जाधव
जी एन आझाद समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात उद्बोधन.

पुसद:तेजस्विता ,तपस्विता आणि तत्परता हे गुण ज्यांच्याकडे असतील तो तरुण होय. कृती आणि विचाराचा सुरेख संगम म्हणजे तारुण्य हा युवाशक्तीचा अर्थ विचारात घेतल्यास देशाचा शाश्वत विकास पूर्ण करण्यात युवकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी मानावी लागेल. शाश्वत विकासाचे १७ ध्येय जानेवारी २०१६ ते २०३० या १५ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे त्यासोबतच १७९ टारगेट सुद्धा पूर्ण करावयाच्या आहेत त्यासाठी शाश्वत विकास घडवून आणण्याची ताकद फक्त युवकांमध्ये आहे असे मौलिक उद्गार श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय पुसद राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव यांनी काढले ते गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विशेष ग्रामीण शिबीर कारला देव या ठिकाणी उद्बोधन सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राखी इंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ जगदीश राठोड, कार्यक्रमाधिकारी प्रा धनंजय कोठाळे, प्रा डॉ.अपर्णा पडगिलवार, प्रमुख वक्ते म्हणून प्रा गजानन जाधव विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर पुष्पगुच्छाने प्रमुख अतिथींचे स्वयंसेवकाकडून स्वागत करण्यात आले. शाश्वत विकासात युवाशक्तीची भूमिका या विषयावर बोलताना ते आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की शाश्वत विकास ही एक अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. शाश्वत विकास म्हणजे निरंतर आणि चिरकाल टिकणारा विकास, देशासाठी आवश्यक आहे. देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर ग्रामीण भागाचा पूर्णपणे विकास झाला पाहिजेत त्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या समस्या रासेयो सारख्या उपक्रमातून जाणून घेऊन द्या पूर्णपणे निराकरण करून शाश्वत विकासाची १७ ध्येय पूर्ण करण्यासाठी युवकांनी समोर येण्याची गरज आहे.
कारण युवकांमध्ये परिस्थिती बदलण्याची, देशाचे भविष्य ठरविण्याची क्षमता, ताकद आहे. त्यासाठी युवकांनी विचार बदलणे आवश्यक आहे परंतु चिंतनात्मक दृष्टीने विचार केल्यास आजच्या काळात युवकांचे सोशल मीडियावरील रिल्स,स्टेटस, डीपी यावरून त्यांचे विचार व देशाचे भविष्य लक्षात घेणे गरजेचे आहे असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ.राखी इंगळे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की ज्या समाजामधून आपण आलेले आहोत त्या समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी नेहमीच आमच्या जी एन आझाद समाजकार्य महाविद्यालयाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्या दृष्टीनेच आमचे युवक महत्त्वाची भूमिका निभावतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. उद्बोधन सत्राचे प्रास्ताविक अंकिता कांबळे , सूत्रसंचालन ज्ञानेश्वरी हांडेवार तर अपेक्षा आडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते श्रमदानाच्या अंतर्गत देवस्थान परिसरात सर्व झाडांची केलेली रंग रंगोटी पाहून त्यांनी स्वयंसेवकांचे कौतुक केले.



