इंदिरा नगर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे तिरुपती नगरी विकासापासून कोसो दूर!

पुसद:देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना आणि महाराष्ट्रात अनेक मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जात असताना मात्र पुसद तालुक्यातील इंदिरानगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तिरुपती नगरी येथील रहिवास्याची दैना सुरूच आहे. ग्रामपंचायत च्या दिशा कारभारामुळे या भागात आजही नागरिक भौतिक सुविधांपासून वंचित असून रस्ते नाल्या नसल्याने या नागरिकांची किती गैरसोय होत आहे, वारंवार संबंधित ग्रामपंचायतीकडे येथील नागरिकांनी भौतिक सुख सुविधा पुरविण्यासाठी विनंती करून सुद्धा जाणीवपूर्वक संबंधित ग्रामपंचायत धृतराष्ट्राचे सोंग घेत आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की,पुसद शहराला लागूनच असलेल्या इंदिरानगर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामपंचायत हद्दीतील तिरुपती नगरी मधील रहिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे.
इंदिरानगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत तिरुपती नगरी ले-आउट ग्रामपंचायतीने अधिग्रहण केले तेव्हापासून या भागात ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुख सुविधा पुरविण्याल्या नसून नागरिकांना आपल्या निवासस्थानी मेन रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तिरुपती नगरी हे ले-आउट अस्तित्वात येऊन जवळपास १५ वर्षे झाले तरीही या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी पावसाळ्यामध्ये सुद्धा वन वन भटकावे लागत आहे. 
तिरुपती नगरी मधील सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या सुद्धा अस्तित्वात नाही. ठीक ठिकाणी मोठे मोठे सांडपाण्यामुळे डबके साचलेली आहेत. या साचलेल्या डबक्यांमध्ये मच्छर निर्माण होऊन नागरिकांना मलेरिया, हिवताप, डेंगू सारख्या साथ रोगाच्याआजाराचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याभागातील रहिवाशांना अनेक समस्याने ग्रासले आहे . कच्च्या चिखलमय रस्त्यावरून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवावरची कसरत करीत चालावे लागत असून पावसाळ्यात सायकलने अनेक विद्यार्थी पडल्याने अपघात सुद्धा झाले आहे तर या चिखलमय रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकांना तर घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.तर या भागातील विद्युत खांबावर कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायतचे लाईट सुद्धा उपलब्ध नसल्याने रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असते सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे या भागातील नागरिकांच्या जीवितवाला धोका निर्माण झालेला आहे. परंतु संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी अधिकारी मात्र जाणीवपूर्वक धृतराष्ट्राचे सोंग घेऊन बसले आहे. असा आरोप ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रिया वानखेडे यांनी केला आहे. तिरुपती नगरी मधील नागरिकांना तात्काळ संबंधित ग्रामपंचायतीने नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर या भागातील नागरिकांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रिया वानखेडे यांनी दिला आहे.



