यावर्षी दिप उत्सवा निमित्त उभारूया प्रकाशाचे नवे तोरण.! -रवी ग्यानचंदानी पुसद जिल्हा उपाध्यक्ष भाजपा

दिवाळी म्हणजे शेतकऱ्यांच्या सुगीचा सण, धनधान्याची आरास घरात आली की दिवाळीचा प्रकाश घरोघरी आनंदात न्हाऊन निघतो. शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांच्या वाट्याला हा आनंददायी प्रकाशक्षण यावा, या दीपावली निमित्त मनस्वी शुभेच्छा !
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हरितक्रांतीच्या प्रयोगातून पुसदला समृद्धी लाभली आहे. परिसरातील पूस, ईसापुर, लोअर पुस ही धरणे शेतकऱ्यांची तीर्थक्षेत्र बनली आहेत. या महाराष्ट्राला पुसदने वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री दिले. या नेत्यांनी आपल्या उत्तुंग नेतृत्वातून पुसदच े नाव शिखरावर नेले. अलीकडच्या काळात माळ पठार व ग्रामीण पुसद भागातील अनेक गावातील वाडी तांड्यातील शेतमजूर रोजगारासाठी पुणे, मुंबई, नारायणगाव सारख्या भागात स्थलांतर करतात. दिवाळी दरम्यान या स्थलांतरणाला मोठा वेग येतो. बरेचदा गावे ओस पडतात. बाहेर पडल्याने त्यांच्या राहत्या घरी पणती पेटत नाही.नवीन हंगामा दरम्यान होणारे स्थलांतरण थांबले पाहिजे. त्यासाठी रोजगाराची साधने तालुक्यातच निर्माण करण्याची खरी गरज आहे. या स्थलांतरित शेतमजुरांचे प्रश्न मोठे आहेत. रोजी रोटी सोबतच आरोग्याचा प्रश्न गहन ठरतो.बरेचशे शेतमजूर ऊस तोडीसाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जातात. उद्याला ऊस कटाईचे यांत्रिकीकरण झाल्यास स्थलांतर करणाऱ्या मजुरांवर भविष्यात गंडांतर येऊ शकते. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन आपल्या परिसरातच रोजगार निर्मितीची सोय करणे गरजेचे वाटते. एमआयडीसीत नवीन उद्योग, शेती पूरक व्यवसायाला प्रोत्साहन, माळ पठारावर विशेषतः उपसा सिंचन या उपाययोजनांमुळे हा परिसर सुजलाम सुफलाम होऊ शकतो. त्यांच्याही जीवनात दिवाळीची प्रकाश फुले फुलावीत. लोकप्रतिनिधींनी प्रकाश वाटा दाखवून खऱ्या अर्थानि दिवाळी साजरी व्हावी, याच अपेक्षा.सोबतच शहरातील अतिक्रमित रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, स्वच्छता साकारावी, विद्यार्थ्यांना योग्य उच्च शिक्षण मिळावे, माता भगिनींना सुरक्षा मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना… दिवाळीच्या शुभेच्छा !!



