पुसद तालुक्यातील शेतकऱ्याचा गेल्या दहा वर्षापासून ‘रक्त चंदनाच्या’ झाडाच्या मूल्यांकनासाठी संघर्ष ;अखेर उच्च न्यायालयाने मूल्यांकना आधी दिला दिलासा.!
रेल्वे विभागाने उच्च न्यायालयात जमा केलेल्या एक कोटी रक्कमेपैकी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पन्नासलाख रुपये !

पुसद: बहुचर्चित नांदेड-सेवाग्राम रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या खर्षी येथील केशव तुकाराम शिंदे यांच्या शेतातील मौल्यवान ‘रक्त चंदनाच्या’ झाडासाठी मूल्यांकनाआधी एक कोटी रुपये मोबदला न्यायालयात जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्याने अखेर दहा वर्षानंतर शिंदे कुटुंबीयांच्या ‘रक्त चंदनाच्या’ संघर्षाला यश आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे विभागाने एक कोटी रुपये रक्कम ता.८ एप्रिल२०२५ रोजी न्यायालयात जमा केली आहे. त्यापैकी ही रक्कम पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
याबाबत सुत्रांनी झेप न्यूज ला दिलेल्या माहितीनुसार खाजगी कंपनीच्या जागतिक दरानुसार या रक्तचंदन झाडाचे मूल्यांकन ४ कोटी ९५ लाख रुपये एवढे असून शासकीय दरानुसार येत्या ७ जून पर्यंत मूल्यांकन करण्याची मुभा नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय मंत्री व न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी रेल्वे विभागाला दिली आहे.पुसद पासून १० किलोमीटर अंतरावर खर्षी गाव आहे. येथील केशव शिंदे (वय ९५ वर्षे) यांची साडेपाच एकर शेत जमीन आहे.या सातबारावर पंजाब ( वय ६५), शंकर (६३) तुकाराम (५०) व सदाशिव (४५) या चार भावांची नावे आहेत. यांच्या शेत जमिनीतून बहुचर्चित नांदेड – सेवाग्राम रेल्वे मार्ग जात आहे. त्यासाठी ही जमीन , तसेच त्यावरील विहीर पाईपलाईन, फळबाग, खैर, साग तसेच आडजातीचे झाडे जिल्हाधिकारी यांनी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी भूसंपादित केली होती. शेती व फळबागासाठी त्यांना १ कोटी ३३ लाख रुपये मोबदला मिळाला. मात्र त्यात पाईपलाईन, आडजात झाडे यांचा समावेश नव्हता. विशेष म्हणजे या सर्वेक्षणासा-तठी आंध्र प्रदेशातील सर्वेअरने मात्र या वृक्षातील भला मोठा वृक्ष हे रक्तचंदन असल्याचे पंजाब शिंदे यांना सांगितले. त्याचवेळी रक्तचंदन हे कोट्यावधी किमतीचे अतिशय मौल्यवान झाड असल्याचे शिंदे कुटुंबाला यांना प्रथमच समजले व येथून रक्तचंदनाच्या मूल्यांकनाचा संघर्ष सुरू झाला.सन२०१४ तेंव्हापासुन पंजाब शिंदे यांनी या झाडाच्या मूल्यांकनासाठी वनविभाग, रेल्वे विभाग, सिंचन विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. परंतु संबंधित कार्यालयाने वारंवार या शेतकऱ्याला टोलवाटोलवी केली तसेच या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे रेल्वे विभागाकडून रक्त चंदनाचे मूल्यांकन होऊ शकले नाही. उलट रेल्वे अधिकाऱ्यांकडून रक्तचंदनाचे झाड वगळून पंधरा मीटरने अलीकडे अलाइनमेंट बदलण्याचा प्रयत्न झाला. या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण होऊन मूळ अलाइनमेंट निश्चित करण्यात आले. उभ्या झाडाचे मूल्यांकन करता येणार नाही असे वनविभागाने कळविल्यानंतर मोबदल्याचा प्रश्न सुटू शकला नाही. अखेर तब्बल आठ वर्षानंतर शेतकरी केशव शिंदे, पंजाब शिंदे यांनी नागपूर उच्च न्यायालयात नोव्हेंबर २०२४ मध्ये रेल्वे विभागाच्या विरुद्ध याचिका दाखल केली. शिंदे यांच्या बाजूने ॲड.अंजना राऊत यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यावेळी उच्च न्यायालयाने बाजू ऐकून घेत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रक्त चंदनाचे मूल्यांकन केलेले नसल्याने एक कोटी रुपये २० मार्च आधी न्यायालयात जमा करा असा आदेश दिला. रेल्वे विभागाने १९ मार्च रोजी एक कोटी रुपये जमा केले. मूल्यांकनासाठी मुदत मागितल्यानंतर ७ जून पर्यंत न्यायालयाने अवधी दिला आहे. आता यात रक्त चंदनाच्या झाडाच्या मूल्यांकनाकडे शेतकऱ्यांचे व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणून रक्त चंदनाच्या मूल्यांकनाचा संघर्ष गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. उच्च न्यायालयाने एक वर्षातच दिलासा दिल्याने. आता नियमानुसार मूल्यांकन करण्यात येईल..
-पंजाब शिंदे, शेतकरी, खर्षी



