चिमुकल्यांनी केला प्रदूषणमुक्त होळीचा संकल्प!

पुसद: होळीसाठी वृक्षतोड न करता शेणापासून तयार केलेल्या चाकोल्यांची प्रत्यक्ष निर्मिती करुन पुसद तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी प्रदूषणमुक्त होळी करण्याचा संकल्प केला.
होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा असून यंदा ‘होळी’ हा सण २४ मार्च रोजी तर दुसर्या दिवशी २५ मार्चला ‘धूलिवंदन’ असल्याने पुसद तालुक्यातील वडसद तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक असलेले शेण आणून त्यापासून शुक्रवारी(ता.२२) चाकोल्या बनवल्या व शनिवारी(ता.२३) त्यांचे प्रदर्षण भरवून पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त होळी करण्याचा संकल्प केला.

यावेळी जिल्हा पुरस्कृत शिक्षक साहेबराव राठोड यांनी होळ्या पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर केला जातो. यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात, कापली जातात.काही तरुण लोकांकडून वर्गणीद्वारे तर काही मुले चोरी, जबरदस्ती करून ऐनकेनप्रकारे वखारीतून, इतर ठिकाणातून, घरांमधून लाकडे जमा करून त्यांची होळी करीत असतात. या होळीमुळे वातावरणात हवा दूषित होते व हवेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.भारतात आज फक्त १२ ते १३ टक्के जमीन जंगलाखाली आहे. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने हे प्रमाण ३३ टक्के असायला हवे. कारण अवैध वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून पर्यावरणासह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगून पर्यावरणपूरक होळी करण्याचे आवाहन केले. आहे.
मुख्याध्यापक एस.बी.जामगडे यांनी पर्यावरणपूरक धूलिवंदन करण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, रासायनिक रंगांचा वापर केल्याने श्वसनाचा त्रास, खोकला आणि कमी ऑक्सिजनची पातळी, त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात.तसेच
पर्यावरण रक्षणासाठी सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी असल्याने प्लास्टिकच्या पिशवीच्या फुग्यांचा वापर करू नये असे उपस्थितांना आवाहन केले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी नैसर्गिक व कोरड्या रंगाचा वापर करुन रंगोत्सव साजरा केला.शाळेने सर्व विद्यार्थ्यांना मिठाई देऊन चिमुकल्यांचा आनंद व्दिगुणीत केला.



