ईतर

सलग बारा वर्षे मुख्यमंत्री पदावर राहणारे वसंतराव नाईक यांच्यासारखा नेता येत्या २५ वर्षात सुद्धा होणार नाही- ना.धनंजय मुंडे

पुसद:सलग बारा वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहणारा कै. वसंतराव नाईक यांच्यासारखा नेता येत्या २५ वर्षात सुद्धा मिळणार नाही असे मत कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद तर्फे कै. वसंतराव नाईक यांच्या ४४ व्या स्मृतिदिनी येथील सुधाकर नाईक सभागृहात मांडले.
येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात कै. वसंतराव नाईक यांच्या ४४ वा स्मृतीदिनी दिनांक १८ ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सदस्य अँड निलय नाईक यांनी आपल्या भाषणात पुसद जिल्हा व्हावा, शेतकऱ्यांना ड्रीपचे १००% अनुदान मिळावे ,शेतकऱ्यांना वीज मोफत मिळावी अशा मागण्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार धनंजय मुंडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कै. वसंतराव नाईक यांनी सलग बारा वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले अशाप्रकारे मुख्यमंत्रीपद भूषविणारा नेता येत्या २५ वर्षातही होणार नाही असे सांगितले. कै. वसंतरावजी नाईक हे रोजगार हमी योजनेचे जनक होते ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात त्यांच्या कार्यकाळात तीनदा दुष्काळ पडला होता तरीसुद्धा त्यांनी योग्य रीतीने कामे करत महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली असे गौरवोद्गार नामदार धनंजय मुंडे यांनी यावेळी काढले. पुसद जिल्हा करण्यासाठी मी दोन्ही आमदार बंधूंसोबत आवाज उठवेल असेही आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की मी कृषिमंत्री होऊन जेमतेम एकच महिन्याचा काळ लोटला असून या काळात इकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडल्या आहेत तर मराठवाड्यात पाण्याअभावी सोयाबीन ,कापूस पिके करपली आहेत. अशा संकटाच्या परिस्थितीत मी शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांचा हात सोडणार नाही, मागेल त्याला शेततळे हे पूर्वी लॉटरी पद्धतीने निघत होते परंतु आता लॉटरी पद्धत न ठेवता मागेल त्याला शेततळे ही योजना मी राबवीत आहे असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यात कपिल जयप्रकाश जाचक मुक्काम पोस्ट जाचकवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ,बजरंग सदाशिव साळुंखे मुक्काम पोस्ट बामणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, विश्वास आनंदराव पाटील मुक्काम पोस्ट लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव, महेंद्र निंबा परदेशी मुक्काम पोस्ट कुसुंबा तालुका जिल्हा धुळे, बाळासाहेब नारायणराव पडूळ मुक्काम पोस्ट लाडसावंगी तालुका जिल्हा औरंगाबाद ,अनिल तुळशीराम शेळके मुक्काम पोस्ट कुंबेफळ तालुका जिल्हा औरंगाबाद ,मिथिलेश हरिश्चंद्र देसाई मुक्काम पोस्ट लांजा जिल्हा रत्नागिरी, संदीप बबन कांबळे मुक्काम पोस्ट खाणू तालुका जिल्हा रत्नागिरी, रवींद्र जयाजी गायकवाड मुक्काम पोस्ट गायवळ तालुका कारंजा जिल्हा वाशिम, अनिल शिवलाल किरणापुरे मुक्काम पोस्ट लवारी तालुका साकोली जिल्हा भंडारा, प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाटे वनस्पती विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महिला शेतकरी सौ .सविता वैभव नालकर मुक्काम पोस्ट चिंचविहिरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषिभूषण दीपक आसेगावकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. फुके यांनी केले. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अनिता नाईक , माजी राज्यमंत्री डॉ. एन पी हिराणी, माजी आमदार नजरधने,आ. अँड निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक,ययाती नाईक, माजी नगरसेवक निळकंठ पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे अनिरुद्ध पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत गीत प्राध्यापक साधना मोहोड- हरणे यांनी आपल्या विद्यार्थीनींन सह सादर केले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close