आजच्या पिढीने नाविन्याचा शोध घेत स्वतः बदलले पाहिजे : गणेश शिंदे
पुसद येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रबोधन!

पुसद : छत्रपती शिवाजी मुत्सद्येगिरी, स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांनी बाल वयातच बघितली. त्यांच्या एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र होते. त्यांनी शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य टिकवले, काकणभर वाढवले. प्रत्येक लढाई संभाजी महाराजांनी जिंकली. त्यासाठी बुलेटप्रुफ जॅकेट तयार केले, झुलता पूल, जलदुर्ग बांधले, जहाज बांधणी केली. प्रत्येक लढाईत त्यांनी नाविन्याचा प्रयोग केला. या इतिहासाचा बोध घेत आजच्या पिढीने नाविन्याचा शोध घेत स्वतः बदलले पाहिजे. नाविन्याचा स्वीकार केला नाही तर जगात टिकणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे (पुणे) यांनी केले. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सवात शुकवारी प्रथम पुष्प गुंफताना शिंदे बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र त्यांनी आपल्या ओघवत्या, प्रभावी प्रबोधनातून उलगडले. आमदार इंद्रनील नाईक यांनी शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड. माधवराव माने होते. यावेळी जगतगुरु संत तुकाराम महाराज विचार पिठावर माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, ॲड.अप्पाराव मैंद, राजन मुखरे, डॉ.अकिल मेमन, सदबाराव मोहटे, दिगंबर जगताप, डॉ.सौ. आरतीताई फुपाटे, माधव वैद्य, अनिरुद्ध पाटील, नारायण क्षीरसागर, सुधीर देशमुख, विजय जाधव, अनुकूल चव्हाण, क्रांती कामारकर, ॲड.रमेश पाटील, प्राचार्य डॉ.गणेश पाटील, सुधाकर ठाकरे, डॉ.सतीश चिद्दरवार, गिरीश अग्रवाल, ॲड.आदित्य माने, डॉ.भानू प्रकाश कदम, साहेबराव ठेंगे, ताहेरखान पठाण, प्रकाश पानपट्टे, अमोल फुके, परमेश्वर जयस्वाल, डॉ.पंकज जयस्वाल, रियासत अली, विलास जामकर, ॲड.भारत जाधव, पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस निरीक्षक पंत उपस्थित होते. गणेश शिंदे पुढे म्हणाले की, संकटांच्या काळात छत्रपती संभाजी महाराज कधीच गर्भगळीत झाले नाही. त्यांच्यापासून संकटांशी लढण्याची प्रेरणा मुलांनी घेतली पाहिजे. संभाजी राजांना घडविण्यासाठी जिजाऊंनी पुढाकार घेतला. शिवाजी महाराज संभाजींना सोबत घेऊन जगले. संभाजी महाराजांनी शास्त्रांचा, अनेक भाषांचा अभ्यास केला, उत्तम प्रशासकाचे चिंतन असलेला बुधभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला. एक राजाचा मुलगा शिक्षण घेतो, आपण का घेऊ नये असे विचारत त्यांनी युवकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे सांगितले. नवीन तंत्रज्ञानासोबत संस्काराची ही नव्या पिढीला गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्यात आले. विकृतीचे अंधानुकरण करू नका, इतिहासाची चिकित्सा करा असे मत नोंदवत गणेश शिंदे यांनी संभाजी महाराजांनी पत्नीला न्याय निवाड्याचे अधिकार दिले होते असे सांगितले. स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे, ही बाब यातून स्पष्ट होते. आज मुलींना समाजात सुरक्षित वाटत नसेल तर, तुम्हाला जय भवानी, जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार नाही, असे युवकांना त्यांनी स्पष्ट बजावले. दोन्ही छत्रपतींनी रयतेसाठी राज्य केले. निसर्गासोबत जुळवून घेणारा कारभार त्यांनी केला. आयुष्य छोटे आहे, आपणही आपल्या कर्माने दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करा, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. सुरुवातीला आसावरी पवार हिने जिजाऊ वंदना सादर केली. शिव जन्मोत्सव समिती प्रमुख शरद मैंद यांनी प्रास्ताविक केले. पुढील वर्षात शिवचरित्र स्पर्धा पुसद तालुक्यात राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवजयंती कार्यक्रमाची ४५ वर्षांची परंपरा पुढे नेल्याबद्दल अँड.माधवराव माने यांनी शरद मैंद यांचा शाल, श्रीफळ, भगवद्गीता ग्रंथ देऊन गौरव केला. नितीन पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठी गर्दी होती.



