पुसद वनविभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे येलदरी स्मृती वनातील माळरान पार भकास पडलंय शासनाचा लाखो रुपये निधी कागदोपत्री दाखविल्याचा माहिती अधिकारात उघड! २९०१ लावलेली झाडं गायब!

पुसद:शहरापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या वाशिम कडे जाणाऱ्या राज्यमार्गालगत खंडाळा-येलदरी वन विभागाच्या पुसद वनपरिक्षेत्रच्या हद्दीतील येलदरी बीटमध्ये वनविभागाचे दूरदृष्टी असलेले वनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी साहा वर्षांपूर्वी तयार केलेले स्मृतीवन उद्यानाची जवळपास ५० लाख रुपये शासनाचा निधी खर्च करून निर्मिती केली होती मात्र आता या वनविभागाच्या कार्यालयाला आता निष्क्रिय वनसंरक्षक अधिकारी लाभल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्याने ‘झाडे लावा झाडे जगवा’ या ब्रीदवाक्याच्या विरोधात जाऊन वनविकासाऐवजी वनभकास करण्याचा प्रयत्न चालविला काय असा प्रश्न निसर्गप्रेमींना पडला आहे तर जैवविविधता आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्मृतीवन उद्यान उभारण्यात आले असली तरी ढिसाळ नियोजन आणि वनविभागाचे दुर्लक्ष यामुळे उद्यान निर्मितीच्या मूळ उद्दिष्टालाच नख लागत आहे.सध्या देखभालीअभावी येलदरी स्मृती वनातील माळरान पार भकास पडलंय शासनाचा लाखो रुपये निधी कागदोपत्री खर्च करून लावलेली झाडं गायब झाली असून हे उद्यान भकास बनले आहे. परिणामी उद्यान विकसति करण्यासाठी शासनाचा लाखोचा निधी कागदोपत्री दाखवून खर्च केल्याचा माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यामुळे स्मृती जपणाऱ्या किंवा निसर्गाच्या कुशीत विसावा घेण्यासाठी निसर्ग प्रेमींना जागाच उरली नसल्याचे विदारक चित्र या वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पहावयास मिळत आहे.
पुसद वन विभागाच्या वतीने वाशिम कडे जाणाऱ्या राज्य मार्गाला लागून पुसद वनपरिक्षेत्रातील येलदरी बीटमध्ये सहा वर्षांपूर्वी जवळपास तीन हेक्टर क्षेत्रात वनविभागाचे तात्कालीन वनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी स्मृती वनाची निर्मिती केली होती. त्यावेळी येथे लावलेली विविध प्रजातीचे वृक्ष मन मोहून टाकायची… एक एक झाड लावून हिरवाईत स्मृती जपू ही संकल्पना वन विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे आज लयास गेली व आज हा सारा परिसर भकास झालाय.. वन विभागातील कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हे स्मृतीवन उद्यान उजाड झालायं..या स्मृती वनातील ५० लाख रुपये खर्च करून लावलेली झाडे गेली कुठे? असा मोठा प्रश्न निसर्गप्रेमी निर्माण करीत असुन हे स्मृतीवन सध्या भ्रष्टाचाराच्या धुक्यात हरवले की काय? याची निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. निसर्गप्रेमींच्या पर्यटनासाठी उभारण्यात आलेले येलदरी स्मृतीवन अक्षरशः उजाड झाल्याचे विदारक चित्र आहे. पुसद वन विभागाच्या वतीने हे स्मृती वन निर्माण करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये उघड झाली. असुन या स्मृती वनात २९०१ झाडांची लागवड झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात आज या ठिकाणी मोजकीच झाडे शिल्लक आहे. त्यामुळे वनविभागाच्या या गैरप्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.या संदर्भात सुप्रभात ग्रुपचे सदस्य व निसर्गप्रेमी संजय एडतकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत वन विभागाकडून माहिती मागविली असता अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून स्मृती वनातील विविध कामांवर सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. कागदोपत्री या स्मृतीवनात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार पिंपळ, जांभूळ, शिसव, बेल, सप्तपर्णी, पारिजातक, रिठा आदी प्रजातींची जवळपास १९०० झाडे लावण्यात आल्याची नोंद आहे. याशिवाय बांबू व विविध शोभेच्या फुलझाडांची ४७५ रोपे, तर स्वस्तिक, बोगनवेल, जेट्रोफा, मधुमालती यांसारख्या वेलींची ५२६ रोपे लावण्यात आल्याचे नमूद आहे. कागदोपत्री दाखविलेल्या आकडेवारी आणि प्रत्यक्षात दिसणारी परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याने या प्रकल्पातील कामकाजाबद्दल निसर्गप्रेमींच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय येथे बोअरवेल खोदून त्यावर पाच एचपी क्षमतेची मोटार पंप बसविल्याची नोंद आहे. जर अशी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तर झाडांच्या संगोपनासाठी त्या पाण्याचा वापर का झाला नाही? आणि जर बोअरवेलमध्ये पाणीच उपलब्ध नव्हते, तर मोटार पंप बसविण्याचा खर्च कां? करण्यात आला? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तसेच सोलर प्लांट, खते यासारखे काही साहित्य स्थानिक बाजारात सहज उपलब्ध असतानाही ते दूरच्या शहरांतून खरेदी केल्याची नोंद असल्याने त्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. एकीकडे शासनाच्या निधीतून लाखो रुपयांचा खर्च दाखविला जात असताना दुसरीकडे स्मृतीवनाची आज झालेली उजाड अवस्था पाहता या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित वन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजय एडतकर तसेच परिसरातील निसर्ग प्रेमी यांनी केली आहे.
स्मृती वनाचे पुनरुज्जीवन करा…
या दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या स्मृती वनाचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. खंडाळा घाटानंतर दाट जंगलाच्या लगत असलेल्या येलदरी स्मृति वनात पुन्हा नव्याने हिरवाई फुलवून पर्यटन विकसित करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. वन खाते निधी नाही अशी बतावणी करून येलदरी स्मृती वनाची स्मृतिच नष्ट करत आहे, हा प्रकार आता थांबवावा, निसर्गप्रेमींची मागणी आहे.



