बोरगडी गावातील मूलभूत समस्या न सोडविल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार

पुसद: तालुक्यातील बोरगडी येथील शेकडो ग्रामस्थांनी दि.१४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना उपविभागीय अधिकारी, पुसद यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे ,बोरगडी येथील नागरिकांच्या मुलभूत सुविधाचा विसर संबंधित प्रशासनाला व राज्यकर्त्यांना पडल्याचा आरोप करण्यात आला असून जर या गावांतील नागरिकांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, १ सप्टेंबर २०२४ रोजी बोरगडी गावालगत असलेल्या नाल्याला महापूर आला होता. या महापुरामुळे गावातील नागरिकाचे जीवन आवश्यक वस्तू वाहून गेल्या. जगण्याचे वांदे झाले, शेत शिवार खरडले, मिळालेल्या दानावर आजपर्यंत येथील नागरिक जगत आहेत. परंतु या महापुरानंतर महाराष्ट्र शासना मार्फत त्वरीत पुरग्रस्त कुटूंबासाठी पाठविल्या गेलेला दहा हजार रुपयाचा निधी शासकीय यंत्रणेने किंवा राजकीय निष्क्रियतेमुळे आज पर्यंत नागरिकापर्यंत पोहोचला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ग्रामस्थांना भोगवटदाराच्या कक्षेमध्ये टाकुन मिळालेल्या मदतीचा घास नाकारला. त्यामुळे ग्रामस्था तर्फे अधिकाऱ्या द्वारा जायमोक्याची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हाला मालक घोषीत करावे व पुरग्रस्तांची आर्थिक मदत आम्हाला त्वरीत द्यावी. अशी मागणी केली आहे.
बोरगडी गावामध्ये येण्यासाठी असणारा रहदारीचा रस्ता महापुराने काही ठिकाणी वाहून गेल्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला होता सध्या शेतामधून फक्त पैदल ये- जा चालू आहे. रुग्णांना पाठीवर दवाखान्यात न्यावे लागते अशी वस्तुस्थिती आहे. सदर रस्ता जि.प. अंतर्गत झालेला असून मेंटनेन्सच्या मुदतीमध्ये आहे. तेंव्हा संबंधीत अधिकाऱ्याला सुचना देवून त्वरीत रस्ता करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावामध्ये पुर येवून मोठे नुकसान होण्याचे कारण की, नाल्यावर कमी उंचीचा पुल बांधल्यामुळे नाला गाळून उथळ झाला आहे. व त्यामुळे नाल्याने नविन मार्ग बदललेला आहे. भविष्यामध्ये याच कारणामुळे मोठा धोका संभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर नाल्यावर पर्याप्त उंचीचा पुल बांधकाम करुन नाला सरळीकरण व खोलीकरण करुन बोरगडी गावाच्या बाजूने पुर प्रतिबंधक संरक्षण भितीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शिवाय पुर ओसरल्यानंतर हातपाय सुजण्याच्या गंभीर आजाराने ग्रामस्थ पिडीत आहेत. लाडक्या बहिणीचे आलेले पैसे सुध्दा उपचारा दरम्यान संपलेले आहेत. तेंव्हा आरोग्य विभागातर्फ रोगनिदान करुन संपूर्ण उपचार व्हावा,अशा प्रकारच्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या असून या जर वेळेत पूर्ण नाही झाल्या, ,बोरगडी येथील नागरिकांच्या मुलभूत सुविधाचा विसर संबंधित प्रशासनाला व राज्यकर्त्यांना पडल्याचा आरोप करत आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



