वीज वितरणकंपनीच्या अनागोंदी कारभारा विरोधात अंबोडा गावकऱ्यांचे साखळी उपोषण दुसऱ्याही दिवशी सुरु!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):-प्रचंड विद्युत बिलाचे चटके सोसत असलेल्या अंबोडा येथील नागरिकांना वीज मात्र मिळत नाही. मागील एका महिन्यापासून अंबोडा येथील विद्युत पुरवठा बंद असून गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावावे लागत आहे त्यामुळे पारावर उरलेला नाही. वीज मंडळाच्या तुघलकी कारभाराविरोधात अंबोडा येथील नागरिकांचा संताप १० जुलैपासून रस्त्यावर आला. शेकडो नागरिकांनी विद्युत मंडळाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करीत महागाव तहसील कार्यालयासमोर
साखळी उपोषणाला सुरुवात केली असून,दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर रस्ता रोको किंवा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. अंबोडा येथे विजेचा खेळ खंडोबा झाला आहे. कित्येक काळापासून विजेचे तार जिर्णावस्थेत असून लोंबकळलेले विद्युत तार तुटून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावात अनेक ठिकाणी विद्युत पोलची कमतरता आहे. तोंडी सूचना आणि लेखी निवेदने देऊनही वीज वितरणचा कारभार सुधारण्याचे कोणतेही चिन्ह नाही,त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. महिनाभरापासून बंद असलेला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा,सिंगल फेज योजनेचे ट्रांसफार्मर वारंवार नादुरुस्त होत असून गावात उच्च दाबाचे ट्रांसफार्मर बसविण्यात यावे,जुने आणि कालबाह्य विद्युत तार बदलून संपूर्ण गावात नव्याने वीज तार टाकण्यात यावे,नवीन १५ विद्युत पोल मंजुर करावे, गावात लाईनमन २४ तास ड्युटीवर हजर राहील याची तजवीज करावी आणि स्वतंत्र गावठाण फिडर देण्यात यावे आदी मागण्या गावकऱ्यांनी केल्या आहेत. साखळी आंदोलनात सरपंच बंडू मुनेश्वर, उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्यसह विनोद पाटील, खुशाल हातमोडे, जितेंद्र हेडे, श्रीकांत ठाकरे, विनोद ठाकरे, प्रवीण राऊत, गजानन तायडे, विनोद उंनाळे, यांच्यासह गावकरी सहभागी झाले आहेत.



