जंतर-मंतरवरील विद्यार्थी व युवकांच्या आंदोलनास समर्थानात; पुसद मनसेच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण!

पुसद : दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी व युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनास समर्थन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुसद तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असून, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता व पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्याव, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.तसेच पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करावा, सर्व स्पर्धा व शैक्षणिक परीक्षांमध्ये पारदर्शकता आणावी, सर्व स्पर्धा तसेच शैक्षणिक परीक्षांचे शुल्क ₹१०० पेक्षा जास्त नसावे आणि बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही आज त्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.* वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला योग्य भाव न मिळणे, अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, पीकविमा व नुकसानभरपाईतील अडचणी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा, पीकविमा व नुकसानभरपाई तातडीने मिळावी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
या लाक्षणिक उपोषणात मनसे जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्य, तालुका संघटक सचिन राठोड, शहर अध्यक्ष आकाश रहाटे, निखिल तालिकोटे, अभिषेक काकडे, राजू रहाटे, सागर चिंतावर यांच्यासह इतर महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले होते.या उपोषणाला विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र गडदे, प्रहार पक्षाचे प्रदीप आडे, गोरसेनेचे जय राठोड, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, बिपीन हरणे, सम्राट वडते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. वीरेंद्र राजे, तालुकाप्रमुख रवी पांडे, शहराध्यक्ष वैभव सुने, विजय बाबर, श्रीमंत रहाटे, संजय भोने, आकाश कोल्हे, संदीप सदावर्ते, गणेश कांबळे, गजानन लकडे, आकाश चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रेमराव सरगर, धीरज पांडे, भीम आर्मीचे अशोक भालेराव, आझाद समाज पार्टीचे जिल्हा सचिव विशाल डाके, ज्ञानेश्वर दुथडे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या उपोषणास प्रामुख्याने पाठिंबा दर्शविला.दिल्ली येथील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या आंदोलनास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा व युवकांचा ठाम पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांचे, युवकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतले नाहीत, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले असून, सदर मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.



