पुसद विधानसभा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध; माघारीअंती चित्र होणार स्पष्ट! दोन सख्खे भाऊ आमने-सामने आल्याने नाईक कुटुंबाला मानणारा वर्ग संभ्रमात!

पुसद:महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ८१- पुसद विधानसभा मतदार संघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यामध्ये आश्विन रमेशलालजी जयस्वाल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी अजित पवार पक्ष), शरद आप्पाराव मैद (राष्ट्रवादी शरद पवार पक्षा), शरद यशवंत भगत (ब. स. प.), डॉ. अर्जुनकुमार सिताराम राठोड (ज. ज. पा.), किसन रामराव अंबुरे (भा. आ. पा.), चक्करवार सुश्रुत मारोतराव (नि. म. पा.), माधव रुखमाजी वैद्य (वंचित बहुजन आघाडी), मारोती किसनराव भस्मे (आ. स. पा. (कांशीराम), अपक्ष उमेदवारः अनिल दत्तराव शिंदे, अलीयार खान रहीम खान, अवेस अहेमद सलीम अहेमद , गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव, जयानंद विजय उबाळे, देविदास सोमला पवार, नथ्थु दाऊ आगलावे, मजहर खान रहीम खान, मधुकर तुकाराम राठोड, मधुकर हनगुजी एडतकर, मधुकर राजू राठोड, मनोज नत्थुजी तुंडलायत (तुंडे), मनिष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव, माजीद अहेमद सलाम अहेमद, ययाती मनोहरराव नाईक, राजु नत्थुजी दुधे, वजाहत अली खान लियाकत अली खान, विशाल बळीराम जाधव, शरद उर्फ बबन विठ्ठल जाधव, शेख जब्बार शेख युसुफ, शेख नौशाद शेख सुलतान,या सर्व उमेदवाराचे छाननीच्यावेळी आज उमेदवारचे अर्ज छाननीच्यावेळी सर्व वैध ठरल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे. दरम्यान अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर असून त्यानंतरच या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु प्रस्थापित कुटुंबातील सख्ख्या भावामध्ये नात्याला तडा गेल्याने बंजारा बहुल मतदारसंघात मताचे विभाजन होण्याची भीती व्यक्त केली जात असून नाईक कुटुंबाला मानणारा वर्ग संभ्रमात आहे. त्यामुळेे पुसद विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आणि चर्चेचा मतदारसंघ मानला जात आहे. हा मतदारसंघ नाईक कुटुंबाचा गड मानला जातो. येथे महाराष्ट्र निर्मितीच्या पूर्वीपासून नाईक कुटुंबाचे वर्चस्व राहिला आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने मात्र आता सध्या नाईक घराण्याच्या वारसामध्येच फूट पडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यावतीने ॲड . इंद्रनील नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर युवा नेते ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन भावांमध्ये टक्कर होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शरद मैंद हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार आदिवासी समाजाचे नेते माधवराव वैद्य हेही निवडणूक रिंगणात उतरल्याने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अश्विन जयस्वाल यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात ‘कॉँटे की टक्कर’ होणार असल्याचं बोललं जातंय, मात्र शेवटी बाजी कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, या मतदारसंघातील अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. इथल्या मतदारसंघातील काय समस्या आहेत? विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिलाय का? की येथे विकास झालाय? या निवडणुकीत मतदारसंघातील समीकरण कशी आहेत? राजकीय गणितं काय आहेत? ॲड इंद्रनील नाईक हे विजयाची पुन्हा पताका झळकवणार का? हे मात्र येणारी निवडणुकीत जनता ठरविणार आहे.



