भोजला शिवरात बिबट्याची दहशत कायम;शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला!

पुसद: तालुक्यातील गणेशपुर शेत शिवारात बिबट्याने मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला चढवून पशुधनाच्या वासरांचे बळी घेतले आहेत.ही घटना ताजी पुन्हा भोजला शेतशिवारातील सुभाष तेलंगे यांच्या शेतातील गायीचा गोठ्यातील एका वासराचा चावा घेऊन दुसऱ्या वासराचा बळी घेतला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, काही दिवसांपासून गणेशपुर ,भोजला ,शेलु खुर्द, रंभा, पिंपळगाव ,पार्डी शेतशिवारात बिबट्याचा वावर नित्याचा झाला असून रोज कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होत आहे. तर भोजला येथील शेतकऱ्याचा गोठा पुसद-वाशीम राज्य मार्गापासून अगदी काही फुट अंतरावर आहे.या भागात बिबट्याचा संचार दिवसाढवळ्या वाढला असून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबटे हल्ला केल्याच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.पंरतु बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेले पिंजरे मात्र कुचकामी ठरत आहेत.व वनविभागाचे पथक मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरले आहे.वनविभागाच्या पथकाकडून स्थानिक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या वतीने जंगला शेजारच्या रानात व वस्त्यात रात्रीची गस्त सुरू केली आहे.वनविभागाचे पथक मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.परंतु पार्डी ,निंबी, गणेशपुर तांडा ,गाजीपुर, शेलु खुर्द, रंभा, पिंपळगाव या परीसरातील शेतकरी रात्रीच्या वेळेला घराच्या बाहेर पडण्याची हिंमत करायला तयार नाहीत भोजला येथील तेलंगे यांच्या गोठ्यातील वासरांवर हल्ला करून ठार केल्याने याबाबत वन विभागाला माहिती दिली असून पंचनामा करण्यात आला आहे.या परीसरातील ग्रामस्थांमधून या बिबट्याला तात्काळ जास्तीत जास्त पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी होत आहे.परिसरामध्ये काही दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. येथे ग्रामस्थ शेतामध्ये काम करतात. शिवाराचे क्षेत्र मोठे असल्यामुळे शेतातील कामे नेहमीच सुरू असतात. त्यातच शेतकऱ्यांच्या शेतात राहुट्या आहेत त्यामध्ये शेतकरी दुधाळ जनावरे बांधतात त्यामुळे या परिसरात शेतशिवारात बिबट्याकडून हल्ल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुटीत घेवून जगावे लागत आहे. बिबट्याचा वावर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



