कोट्यावधी रुपयाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी जन संघर्ष अर्बन निधी कंपनीच्या संचालकांवर अखेर गुन्हे दाखल!

दिग्रस/प्रतीनिधीची: येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि. शाखा बंद असल्याने खातेदारांच्या ठेवीमध्ये अफरातफरीच्या चर्चेला उधाण आले होते. प्रणित मोरे सह इतर संचालकांनी कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाल्याची शंका उपस्थित केली जात होती. संचालकांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक ठेवीदार, खातेदारांनी पोलीस स्टेशन गाठले होते. अनेक तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या, सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी खातेदारांचा दबाव वाढत होता. अखेर पोलिसांच्या चौकशी अंतिम काल १७ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता जन संघर्ष अर्बन निधीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले.जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस च्या संचालक मंडळांनी ठेवीदारांना १२ टक्के व्याजदर तसेच एक ग्रॅम सोन्याचा शिक्का असे अनेक प्रलोभने दाखवून ठेवीदारांना आकर्षित करून वेगवेगळ्या आमिशेदाखवून करोडो रुपयांची ठेवी जमा केल्या होत्या. ९ डिसेंबर २०२४ रोजी जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड कंपनीच्या अनेक शाखा बंद झाल्याने, जनसंघर्ष बुडल्याची चर्चा जोर धरू लागली होती, त्यात सर्व संचालक फरार होते. त्यामुळे जवळपास ७०० ते ८०० ठेवीदारांनी दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पाच शाखा त्यामध्ये दिग्रस, दारव्हा, नेर, पुसद आणि आर्णी यामध्ये एकूण ४४ कोटी रुपयांचा अपहार फसवणूक झाल्याचे पोलीस चौकशी अंती निदर्शनास आले. या संचालक मंडळामध्ये प्रणित देवानंद मोरे, साहिल अनिल जयस्वाल, प्रीतम देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मणराव मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल नारायण जयस्वाल, पुष्पा अनिल जयस्वाल यांचे विरुद्ध १७ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता अपराध क्रमांक ७४५ / २४ नुसार कलम ४०६, ४०९,४२०, १२०(ब) ३४ भादवी सह गुन्हे नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
ठेवीदारांनी घाबरून जाऊ नयेः चुलमुला रजनीकांत उपविभागीय पोलिस अधिकारी
जन संघर्ष अर्बन निधीच्या सर्वठेवीदार खातेदारांनी काळजी करू नये कारण जन संघर्ष अर्बन निधीच्या सातही लोकांविरुद्ध कलम तीन महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्या च्या माध्यमातून संचालकांच्या नावे असलेली सर्व प्रॉपर्टी बैंक बॅलन्स सिल केल्या जाईल. आणि जप्त करून तपासांती लिलाव करून सर्व ठेवीदाराचे खातेदारांचे पैसे परत दिल्या जाईल, अशी प्रतिक्रिया सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, दारव्हा चुलमुला रजनीकांत यांनी दिली आहे.



