‘श्वास हा प्रत्येक मानवा नित्य त्याचे गीत व्हावे, शेवटी माझ्या तन्मुखी राख नव्हे भस्म व्हावे.’-प्रा.डाॅ. स्वानंद पुंड ; लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान पुष्प

पुसद:माणसाला प्राप्त झालेला मानव जन्म हा अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. हे मानवी जीवन आनंदी, सुखी, परोपकारी बनविण्याचा प्रत्येकानी निर्धार करावा. माणसाचा प्रत्येक श्वास हा आपल्या आनंदात परावर्तित करता आला पाहिजे त्यासाठी त्यांचे कर्तृत्व चांगले असावे लागते. यज्ञ म्हणजे काहीतरी जाळून वाया घालवणे नव्हे तर यज्ञातील आहूती ही उपकारक असावी तेव्हा प्रत्येक माणसाचा श्वास हा माणसाचे नित्य गीत व्हावे, शेवटी माझ्या तन्मुखी राख नव्हे भस्म व्हावे. कारण राख ही वाया जाणारी असते, तर भस्म हा चांगल्या लोकांच्या शिरस्थानी लावल्या जाते. असे अत्यंत मौलिक उद्गार वणी येतील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. स्वानंद पुंड यांनी काढले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ स्थानीय शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसदचे संस्थापक अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष, माजी आमदार दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या ३८ व्या स्मृतीदिनामित्त आयोजित व्याख्यान पुष्पात श्वास माझा गीत व्हावे या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री डॉ एन पी हिराणी, कृषिभूषण दीपक आसेगावकर, माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, आमदार ॲड.निलय नाईक, डाॅ.उत्तमराव रुद्रवार यासह प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डाॅ.स्वानंद पुंड हे विचार पिठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज ,लोकनेते देवराव पाटील चोंढीकर, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सारंग कोरटकर व महेंद्र अंबुरे यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी प्रमुख वक्ते प्रा. डाॅ. स्वानंद पुंड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व्याख्यान पुष्पाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय डाॅ.उत्तमराव रुद्रवार यांनी करून दिला.
अविरत चालणाऱ्या देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान पुष्पाचे हे ३७ वे वर्ष. या व्याख्यानपुष्पात प्रा.डाॅ. स्वानंद पुंड पुढे म्हणाले की, माणसाला आपला प्रत्येक विचार गीतात म्हणता आला पाहिजे. कारण आपल्याला सुखी होण्यासाठी कुणालातरी दु:खी होणे भाग आहे. म्हणून आपल्या जीवनाचे रडगाणे नाही तर गाणे झाले पाहिजे. गाणे हे स्वच्छतेतुन व शुध्दतेतुन प्रगट होतात. जगातील प्रत्येक गोष्टीला मुल्य आहे. त्याग हा त्यांनीच करावा, ज्याच्याकडे सामर्थ्य असते.आनंदाला पर्याय नसतो. आपले सुख दुस-याच्या दु:खावर अवलंबून आहे. दुस-याला हसण्याची संधी न देण्यासाठी आपण रडु नका. कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा लोक हसतात. जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल तर आपला श्वास गीतात परावर्तित करा असेही ते शेवटी म्हणाले. सदर व्याख्यान पुष्पाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी तर प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या व्याख्यान पुष्पासाठी पुसद परिसरातील नामवंत मान्यवर, पत्रकार, रसिक श्रोते तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



