पुसद: तालुक्यातील शिळोना ग्रामपंचायतला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन विहिरीची जागा पाथरवाडी ऐवजी भरपूर पाण्याचा स्त्रोत असलेल्या जांब नाला प्रकल्पाजवळ घेण्यात यावी,अशी मागणी पाथरवाडी येथील आदिवासी महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .यासंदर्भात पाथरवाडी गावातील आदिवासी गावकऱ्यांनी ता.६ रोजी उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले.मागील दीड वर्षापासून पाथरवाडी गावातील आदिवासी बांधवांच्या वतीने वारंवार संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.परंतु, प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे व दिलेल्या तक्रारीच्या विचार केला जात नसल्यामुळे आदिवासी समाजाने आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.शिळोना ग्रामपंचायतसाठी जल जीवन मिशन विहिरीची जागा पाथरवाडी मधील अतिशय लहान पाझर तलावा जवळ न घेता जांब नाला प्रकल्पावर सदर विहीर व्हावी.जांब नाला तलाव हा पाथरवाडी पाझर तलावापेक्षा पंधरा पटीने मोठा आहे. या विहिरीतून शाश्वत पाणीपुरवठा होऊ शकतो. केंद्र शासनाची जल जीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. शासनाचा निधी व्यर्थ जाऊ नये, शिळोना ग्रामपंचायतला दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा व्हावा तसेच पाथरवाडी मधील आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी मागील दीड वर्षापासून शासनाकडे मागणीचा पाठपुरावा सुरू आहे आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास ता.९ पासून पाथरवाडी गावातील महिला आणि नागरिक गावामध्येच आमरण उपोषणाला बसणार आहे.जोपर्यंत आमच्यावर होणारा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत नाही बसणार. शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.