पत्रकाराबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे वादग्रस्त वक्तव्य; ऑडिओ क्लीप व्हायरल!

अहमदनगर(वृत्तसेवा):भाजपाच्या ‘घर चलो अभियान’ साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लीप तुफान व्हायरल झाली आहे. तुमच्या बूथवरील पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा आणि चहा म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलच असेल असा वादग्रस्त सल्ला चंद्रशेखर बावनकुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं त्यामध्ये ऐकू येत आहे. परंतु या वक्तव्यामुळे राज्यातील पत्रकार तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. अहमदनगर येथे बावनकुळेंच्या उपस्थितीत महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करत होते. तेव्हा बावनकुळे यांनी तुमच्या बुथवरील चार पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा, ज्यामुळे आपल्या विरोधात बातम्या छापून येणार नाहीत अशा आशयाचे विधान बावनकुळे यांनी केलं असे सांगितले जात आहे. या संदर्भात अनेक वृत्तवाहिन्यांनी यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये काय आहे..? भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या ऑडिओ क्लीपमध्ये तुम्ही ज्या चार बूथवर काम कराल त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? छोटे-छोटे पोर्टलवाले गावात फिरतात. आपण आपल्या बुथवर एवढं चांगलं काम करतो, पण एखादे असे टाकतात की जसं गावात बॉम्बच फुटला. तुमच्या बुथवर चार दोन जे पत्रकार आहेत, त्यात कोण कोण आहेत त्यांची यादी बनवावी. हे चार-दोनच असतील. एक दोन पोर्टलवाले असतील, एक-दोन प्रींट मीडियावाले असतील, एकदोन इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील. या पाच-सहा जणांना महिन्यात एकदा चहा प्यायला बोलवा, त्यांनी महाविजय २०२४ मध्ये फक्त आपल्या विरोधात काही लिहू नये. त्यांना चहा प्यायला बोलवा, म्हणजे काय ते तुम्हाला समजलं.त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कोणतीही बातमी त्या चार बूथवरती आपल्या फेवरमध्ये आली पाहिजे, आपल्या विरोधात नाही. त्या चार बूथवर एकही बातमी आपल्या विरोधात आली नाही पाहिजे. आपल्यासाठी पॉझिटीव्ह आली पाहिजे निगेटिव्ह नाही, असेही बावनकुळे या कथित व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये म्हणताना ऐकू येत आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं स्पष्टीकरण..
ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या ऑडोओचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. मी म्हणाले की चुकीच्या बातम्या येऊ नयेत. एखादी घटनाच घडली नाही त्या घटनेच्या बातम्या येतात. छोटे-छोटे पोर्टल बातम्या चालवतात, कारण त्यांच्याकडे पूर्ण माहिती नसते. आपलंही मत आलं पाहिजे. पत्रकारांना बातमी देण्याचा अधिकार आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण आमचं मत ऐकलं पाहिजे. मत जाणार नाही तर ती बातमी एकतर्फी असेल असं मी म्हणालो, त्यामुळे त्यात काही गैर नाही असेही बावनकुळे म्हणाले आहेत. खासदार सुप्रिया सुळेंची टीका.. “विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी,” अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे.



